मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींवर लाठीचार्ज २० अटकेत नागपूर हिवाळी अधिवेशन
यशवंत स्टेडियम परिसरात तणावपूर्ण परिस्थिती
दैनिक समतापथ : १३ डिसेंबर
नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागपूर येथील यशवंत स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.
९ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुमारे १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. निवडणुका व आंदोलनाचा पाठपुरावा लक्षात घेऊन हा कार्यकाळ पाच महिन्यांनी वाढवण्यात आला. मात्र प्रशिक्षण संपल्यानंतर कायम अथवा किमान कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.
या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी यापूर्वी नाशिक, सांगलीसह राज्यभरात जवळपास १९ आंदोलने केली. आश्वासने देऊनही कोणताही ठोस शासन निर्णय (GR) न निघाल्याने मानव मित्र संघटना व मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षणार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचा आरोप प्रशिक्षणार्थ्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार असल्याचे सांगत वेळकाढूपणा करण्यात आला. संतप्त प्रशिक्षणार्थी मंत्र्यांना भेटण्यासाठी गेटकडे जात असताना पोलिसांनी गेट बंद करून अडथळा निर्माण केला.
त्यानंतर परिस्थिती चिघळली. घोषणाबाजी सुरू होताच पोलिसांनी दडपशाही करत महिलांसह प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्ज केला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे बालाजी पाटील चाकूरकर यांच्यासह सुमारे २० प्रशिक्षणार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना स्टेडियममध्येच रोखून ठेवण्यात आले. नंतर त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. रस्ता रोको करत पायी निघालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पोलिसांनी वाहनांत बसवून हिंदी शाळेत नेले. काही वेळाने ताब्यात घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तेथे आणण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळली.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींना दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करून कायम रोजगाराबाबत स्पष्ट शासन निर्णय काढावा, अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी व मागण्या पूर्ण झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असे आंदोलक घोषणा बाजी देऊन
दडप शाही शासन प्रशासन विरुद्ध नाराजी व्यक्त करत केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा